रत्नागिरी : माळनाका येथील मराठा मंडळ सभागृहात तटरक्षक दलाचे कमांडंट एस. आर. पाटील यांची दिल्ली येथे बदली झाली असून, त्यानिमित्त रत्नागिरी जिल्हा माजी सैनिक संघटनेतर्फे त्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. जिल्ह्यातील माजी सैनिकांसाठी केलेल्या कार्यांसाठी कमांडंट पाटील यांना आणि भारतरत्न प्रतिष्ठानचे अध्यक्ष बलराम कोतवडेकर यांना माजी सैनिक संघटनेतर्फे गौरविण्यात आले.
या प्रसंगी बोलताना संघटनेचे पदाधिकारी सावंत म्हणाले, ‘तटरक्षक दलातर्फे माजी सैनिकांना नेहमीच सन्मान दिला जातो, त्यांच्या निवृत्त जीवनात आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासाठी तटरक्षक दल नेहमीच प्रयत्नशील असतो. कमांडंट पाटील यांनी मुख्यालयात, तसेच मंत्रालयात जाऊन विविध उच्च अधिकारी, मंत्री यांच्याशी नियमित पाठपुरावा करून तटरक्षक दलाच्या कार्यालयात रत्नागिरी परिसरातील माजी सैनिकांसाठी मिलिटरी कॅंटीन चालू केले. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.’
रत्नागिरीच्या भारतरत्न प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष कोतवडेकर यांचा सत्कार करताना सावंत म्हणाले, ‘ही संस्था खेडोपाडी जाऊन माजी सैनिकांना एकत्रित आणण्याचे कार्य करीत आहे; तसेच वृद्ध, दुर्लक्षित व उपेक्षित माजी सैनिक, वीरपत्नी, वीरमाता यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना यथाशक्ती मदतीचा हात देत आहे.’
मनोगत व्यक्त करताना कमांडंट पाटील म्हणाले, ‘माजी सैनिकांनी खडतर परिस्थितीत केलेली देशसेवा, वेळप्रसंगी दाखविलेले शौर्य, त्यांनी व त्यांच्या कुटुंबांनी केलेले त्याग आणि बलिदान यांचे आम्ही सदैव भान ठेवतो. त्यांच्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा रत्नागिरीत आणण्यासाठी आम्ही नियमित प्रयत्नशील असून, त्यातूनच मिलिटरी कॅंटीनची रत्नागिरीत सुरुवात केली आहे; तसेच योग्य अशी इमारत उभी रहाताच ही कॅंटीन मोठ्या तत्वावर चालविण्यात येतील.’
या शिवाय रत्नागिरी येथे तटरक्षक दलाच्या जवानांची संख्या वाढल्यानंतर भविष्यात आजी-माजी सैनिकांसाठी मिलिटरी हॉस्पिटलसाठीदेखील मान्यता मिळविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही कमांडंट पाटील यांनी सांगितले. माजी सैनिकांच्या हक्कांसाठी व कल्याणासाठी अहोरात्र तळमळीने झटत असलेले रत्नागिरी जिल्हा माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सुभाष सावंत, उपाध्यक्ष कॅप्टन नंदकुमार शिंदे आणि सचिव शंकरराव मिलके यांचे त्यांनी कौतुक केले. देश सेवेसाठी सर्वस्व पणाला लावण्यासाठी वापरली जाणारी ‘एकदा सैनिक जीवनभर सैनिक’ ही सैन्य दलातील उक्ती या तिघांनी खरी करून दाखवली असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच भारतरत्न प्रतिष्ठानच्या तरुण कार्यकर्त्यांचे कार्य खूपच वाखाणण्याजोगे व प्रेरणादायी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
या वेळी सेवानिवृत्त कर्नल शशिकांत सुर्वे, सर्जन लेफ्टनंट कमांडर प्रशांत पाटील, तटरक्षक दलाचे इतर अधिकारी, भारतरत्न प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि रत्नागिरी परिसरातील अनेक माजी सैनिक सहपरिवार उपस्थित होते.